मुलींनो खेळातून करीअर घडवा – जिल्हाधिकारी, संजय मीणा

0
50

घोट येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाला सुरूवात

गडचिरोली, दि.10 : भारतातीय युवा पिढीने जगभरात विविध क्षेत्रात आपले नावलौकिक केले मात्र खेळात आजही आपण खुप प्रगती करणे गरजेचे आहे. खेळांमधे आजही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून खेळातूनच आपले करीअर घडवा असा संदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी घोट येथील अहिल्यादेवी बालगृहातील मुलींना दिला. चाचा नेहरू जिल्हास्तरीय बाल महोत्सव व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अनाथ, निराधार, निराश्रीत व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेकांस आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन संपुर्ण देशात प्रत्येक जिल्हयात केले जाते. गडचिरोली जिल्हयात मुलींचे बालगृह एकच असल्याने जवळील शाळांच्या मुलींनाही त्या स्पर्धेत संधी देण्यात आली होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या इथे मुलांना लहानपणापासूनच शैक्षणिक गुणवत्तेसाठी जास्त जोर दिला जातो. तसे तर आपण सरासरी 35 वयापर्यंत किंवा पुढेही शिकू शकतो. मात्र खेळात करीअर घडविण्यासाठी आपणाला 10 ते 15 वयापर्यंतच शरीर तयार करावे लागते व त्याच वयात आपल्याला खेळाचे खऱ्या अर्थाने कौशल्य प्राप्त होते. खेळांमधे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडील मुलांचे प्रमाण फारच नगण्य असून त्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. शाळेत किमान एक तास दररोज खेळायला हवे असे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रूपाली दुधबावरे सरपंच, सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी, संदिप रोंडे सहायक पोलीस निरीक्षक घोट उपपोलीस स्टेशन, हरीदास चलाख, प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्षा मनवर अध्यक्षा बाल कल्याण समिती, अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, विलास ढोरे, पुरूषोत्तम मेश्राम उपस्थित होते.

खेळाचे महत्त्व पटवून देताना जिल्हाधिकारी मीणा म्हणाले, खेळामुळे चांगले शरीर चांगले आरोग्य कमवता येते. बालगृहातील मुलींनी आयुष्याची काळजी करण्याचे सोडून या वयात शिक्षणाबरोबर खेळाकडे जास्त लक्ष द्यावे. इच्छाशक्ती व चिकाटीतून आपले भविष्य घडविण्यासाठी या महोत्सवात योगदान द्या. संस्थेतील प्रवेशितांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना त्यांच्यातील कलात्मक गुण, कौशल्य दाखवून देण्याची चांगली संधी प्राप्त होते. या महोत्सवामधे कबड्डी, धावण्याच्या स्पर्धांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध, चित्रकला, गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 12 जानेवारी पर्यंत घोट येथील बालगृहात संपन्न होणार आहे. विजेत्या मुलींना पुढिल विभागीय स्पर्धेसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here